महाराष्ट्रराजकीयसामाजिक

बुद्ध तत्त्वज्ञान आणि मूल्यांचा उद्योग, व्यवस्थापनात उपयोग करा : डॉ. प्रशांत पानसरे 

एसबीपीआयएम येथे इन्स्पायर २०२६ आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न 

पिंपरी : गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान, संतुलित विचार आणि जबाबदार कृती या मूल्यांचा उद्योग आणि व्यवस्थापन क्षेत्रासाठी उपयोग केल्यास उत्तम व्यवसाय स्थापित करता येऊ शकतो. जग जागतिक परिवर्तनाच्या टप्प्यातून जात असून भूराजकीय पुनर्रचना घडत आहेत. जसे की चीनने पुरवठा साखळी व्यवस्थापनात मोठी प्रगती केली असली तरी भारतासारख्या विकसनशील देशांसाठी उत्पादन क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहेत असे प्रतिपादन उद्योगतज्ज्ञ डॉ. प्रशांत पानसरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे “इन्स्पायर २०२६ शाश्वत पद्धती, नवोपक्रम आणि जबाबदार उद्योजकता” या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद आछयोजित करण्यात आली होती.

यावेळी बातांगा विद्यापीठ फिलिपाईन्स डॉ. पॅस्टर आर्गुएल्स, एसआयआयटी थम्मसात विद्यापीठ थायलंड डॉ. थनवडी चिंडा, वर्कस्टर विद्यापीठ युके डॉ. पाओलो मोरा-अव्हीला, राजाभट्ट युनिव्हर्सिटी थायलंड डॉ. अरुण चेनीत, एसबीपीआयएम संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. रूपाली कुदरे आदी उपस्थित होते.

 

डॉ. प्रशांत पानसरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य हे देशातील डेटा सेंटर कॅपिटल म्हणून वेगाने विकसित होत आहे, ज्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे. वाढती लोकसंख्या, गरिब रेषेखालील लोकांचे वाढते उत्पन्न आणि तरुणांची वाढती संख्या यामुळे भारत जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक बनत आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात चिप डिझाईन, संशोधन आणि तंत्रज्ञान विकास यामध्ये भारताने पुढाकार घ्यावा, तर उत्पादन प्रक्रियेतील काही भाग जागतिक स्तरावर आउट सोर्सिंगद्वारे विकसित होऊ शकतो. तसेच डिजिटल इनोव्हेशन, डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि डिमांड फोरकास्टिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे उद्योगक्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत असे उद्योगतज्ज्ञ डॉ. प्रशांत पानसरे म्हणाले.

 

या परिषदेसाठी एकूण ५३८ सहभागींनी नोंदणी केली आणि २४० संशोधनपर लेख सादर केले. भारत, अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, फिलिपिन्स, थायलंड, लेबनॉन आणि दुबई या देशांतील संशोधकांचा यात समावेश होता. या परिषदेस वॉर्सेस्टर युनिव्हर्सिटी ऑफ युनायटेड किंग्डम, वॉर्सेस्टर बिझनेस स्कूल यांचे सहकार्य मिळाले होते. जर्नल प्रेस ऑफ इंडिया ही संस्था प्रकाशन भागीदार होती. यावेळी तीन जागतिक विद्यापीठांसोबत संशोधन करार करण्यात आला.

या परिषदेत पॅनालिस्ट राजाभट्ट युनिव्हर्सिटी थायलंड डॉ. अरुण चेनीत, वर्कस्टर विद्यापीठ युके डॉ. पाओलो मोरा-अव्हीला, सायबर इलेक्ट्रॉनिक वारफेअर आर्मी वॉर कॉलेज कर्नल डॉ. वीरेंद्र मिश्रा, स्किलव्हेर्ज सीईओ जय ढोलकिया, सेल्स मार्केटिंग प्रमुख थंबूराज अंथुवन, एसबीपीआयएम समन्वयक प्रा. भूषण परदेशी यांनी सहभागीं सोबत व्यवस्थापन, शाश्वत विकास, जबाबदार व्यवसाय नवोन्मेष आणि डिजिटल परिवर्तन यांसारख्या विषयांवर चर्चा केली.

Related Articles

Back to top button