महाराष्ट्र

डॉ. दाभोलकर व फडणवीसांची तुलना करणारे सुप्रिया सुळेंचे विधान संताप आणणारे

प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा वारसा चालवत आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांचे विधान दिशाभूल करणारे, चिड व संताप आणणारे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर व देवेंद्र फडवणीसांची तुलना होऊच शकत नाही, दोघांच्या विचाराचा वारसा व मार्ग भिन्न आहेत, असे स्पष्ट करून खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

सुळे यांच्या विधानाचा समाचार घेत सपकाळ पुढे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंद्धश्रद्धेचे निर्मुलन व्हावे, समाज जाणता व्हावा यासाठी आयुष्य खर्ची घातले व ते कार्य करत असतानाच ते शहीद झाले. दाभोलकरांचा वारसा हा शिव, शाहु, फुले, आंबेडकरांचा, अंधश्रद्धा निर्मुलनाचा, सत्य व अहिंसेचा आहे, वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाणारा आहे. दाभोलकरांचे योगदान मोठे आहे, तर देवेंद्र फडणवीसांचा मार्ग हा अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारा आहे, पुरोगामी विचाराला बाजूला ठेवून प्रतिगामी विचाराला चालना देणारा आहे, अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारा, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारा आहे, दोघांचा मार्ग एक असूच शकत नाही.

ज्यांनी शिवाजी महाराजांचा वारसा नाकारला, तुकारामांच्या गाथा बुडवल्या, त्यांचे वैचारिक वारसादार फडणवीस आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विरोध करणारा वारसा फडणवीस पुढे घेऊन जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्यांचा वारसा त्यांचा आहे. संविधान गुंडाळून बंच ऑफ थॉट चा संघाचा वारसा पुढे घेऊन जाणारा विचार फडणवीस यांचा आहे, असेही सपकाळ म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर हे मला भावासारखे आहेत, अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील होते तर मी त्या समितीचा सदस्य होतो. सुळे यांच्या वक्तव्यावर मी दुःख व खंत व्यक्त करतो. सुप्रिया सुळे यांना त्यांचे वडील शरद पवार यांच्या पुरोगामी विचाराचा तसेच ज्य़ेष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे, याची जाणीव व भान त्यांनी ठेवावे. सुप्रिया सुळे चोर व सन्यासी दोघांना एकत्र दाखवत आहेत, त्यांचे वक्तव्य चिड व संताप आणणारे आहे, त्यावर त्यांनी खुलासा करून विधान मागे असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button